स्थानिक
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण शहरात दि.28 रोजी आगमन,नगरपालिका प्रशासन सज्ज,शहरातील पालखी मार्ग चकाचक
फलटण – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटण शहरात शनि.दिनांक 28 रोजी आगमन होत असून फलटण नगरपालिकेचे मार्फत माऊलीच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. पालखी मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे.भाविकांना सर्व सोयी सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर फलटण पालिकेकडून रस्ते , आरोग्य , पाणीपुरवठा बाबतीत पूर्ण सज्जता झाली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २८ जून २०२५ रोजी फलटण मुक्कामी येत आहे. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिका मार्फत चालू असलेली आणि झालेली कामे याबाबत मुख्याधिकारी निखील मोरे यांनी सांगितले की , फलटण शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे पालिकेकडून पाठपुरावा करण्यात आला असून वेळोवेळी झालेल्या पावसाच्या अडथळ्यातून पालखी मार्गाची आणि वाहतुकीच्या मार्गाची तात्पुरती डागडुजी पूर्ण झाली आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील पुलांचे तुटलेले रेलिंग तातडीने बसवण्यात आले असून नदीपुलावरून चालताना वारकरी यांना कोणताही धोका होणार नसल्याची दक्षता घेतली आहे. पालखी मार्गावरील दगड माती उचलण्याचे आणि स्वच्छता करण्याचे काम युद्धपातळीवर चालू असून यासाठी स्वतंत्र टीम नेमण्यात आलेली आहे.
वारकर्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून शहरातील प्रत्येक प्रमुख चौकात एक पाणपोईची व्यवस्था करण्यात येणार आहे. वारकर्यांचे पाण्याचे टँकर भरण्यासाठी पालिकेच्या पाणी पुरवठा केंद्रावर कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध देण्यात आली आहे, याठिकाणी एकाच वेळी 8 पाणी टँकर भरू शकतील अशी व्यवस्था असून एक 10 हजार लिटर टँकर 7 ते 8 मिनिटे मध्ये भरून होईल,असे मुख्याधिकारी निखील मोरे यांनी नमूद केले आहे.



