फलटण -फलटण शहरात वाढत्या गुंडगिरीमुळे तसेच व्यापाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.व्यापाऱ्यांना संरक्षण द्यावे, गावगुंडांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी आज फलटण शहर पोलीस ठाण्यात येऊन व्यापाऱ्यांनी निवेदन देऊन दहशत माजवणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
दोन दिवसांपूर्वी फलटण शहरातील गवळी बंधूंवर आठ ते दहा जणांनी हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता यावर शहरात संतापाचे वातावरण पसरले असतानाच काल शहरातील व्यापारी पटेल बंधूंना दोघा युवकांनी दमदाटी करून दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला होता. शहरात वाढत चाललेली गुंडगिरी व दहशत यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी आज फलटण शहर पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना फलटण शहर दहशतमुक्त करण्याचे तसेच गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांवर दहशत माजविली जात असल्याने व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी सुद्धा तसेच वेळोवेळी गस्त घालण्याची मागणी करण्यात आली. अनेक व्यापाऱ्यांनी यावेळी गुंडगिरी करणाऱ्या युवकांची धिंड काढण्याची मागणी केली.
सर्व व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी फलटण शहरात बंदोबस्त वाढविला जाईल, साध्या वेशातील पोलीस ठिकठिकाणी थांबतील तसेच वेगाने मोटरसायकल चालवणाऱ्या तसेच मोठ्याने हॉर्न व फटाके वाजवणाऱ्या युवकांवर कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली. फलटण शहरात शांतता राहावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करू असेही पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितले.