केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा निर्णय: दिमाखी ताफा सोडला; आता बसने करणार पालखी मार्गाची पाहणी

फलटण – देशातील रस्ते विकासाला नवी गती देणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या साधेपणाचा आणि कार्यतत्परतेचा नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गडकरी दि. १४ आणि १५ मे रोजी विशेष ‘बस’ने प्रवास करणार आहेत.
व्हीआयपी संस्कृतीला फाटा; ५० टक्के ताफा कमी
साधारणपणे केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी गाड्यांचा मोठा ताफा आणि कडक सुरक्षा असते. मात्र, गडकरी यांनी या दौऱ्यासाठी आपल्या अधिकृत वाहनांच्या ताफ्यात ५० टक्के कपात करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनावरील ताण कमी व्हावा आणि रस्त्याची पाहणी बारकाईने करता यावी, या उद्देशाने त्यांनी बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे.
असा असेल दोन दिवसांचा दौरा:
- १४ मे: पुणे ते अक्कलकोट
- सकाळी पुण्यातील जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेलमधून प्रवासास सुरुवात.
- दिवे घाट, जेजुरी मार्गे फलटण येथे नीरा कालवा पुलाची पाहणी.
- नातेपुते, वेळापूर आणि वाखरी मार्गे प्रवास करत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन.
- संध्याकाळी अक्कलकोट येथे विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन.
- १५ मे: उर्वरित कामांची पाहणी
- दुसऱ्या दिवशी पालखी मार्गावरील प्रलंबित कामे, वृक्षारोपण आणि वारकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला जाईल.
निकृष्ट कामांची खैर नाही!
पालखी मार्गावरील काही ठिकाणच्या कामांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गडकरी स्वतः बसने प्रवास करून रस्त्याचा दर्जा, उड्डाणपूल, आणि सेवा रस्ते यांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. “कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा सज्जड दमही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.



